राज्यातील 22 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 2920 कोटी रुपयांची मदत मंजूर
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नाशिक, धुळे, अहिल्यानगर (अहमदनगर), नंदुरबार, जळगाव, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, सातारा, सोलापूर, आणि सांगली या 22 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने 2920 कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे.
या वर्षी राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसानीची भरपाई देण्यासाठी 2920 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि नागपूर विभागातील 22 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना शेतीसाठी नव्याने सुरुवात करण्याचा आत्मविश्वास मिळेल. या निधीच्या वितरणाबाबत शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. ही आर्थिक मदत वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघण्यास मदत होईल.